News

चवदार तळे सत्याग्रह

• १९ व २० मार्च १९२७ रोजी गावोगावीचे लोक महाड येथील परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते, शनिवारी १९ तारखेला सिं, प्रा, ना मंडळीचे नाट्यगृह किवा वीरेश्वर थिएटर लोकांनी खच्चून भरले होते, परिषदेचे उदघाटन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विचार प्रवर्तक व समर्पक विचार मांडले, या शोषित पीडित समाजाची स्थिती वर्णन करून आचार विचार उच्चार याची माहिती झाली पाहिजे भीक मागणारे लाचार जीवन व्यतीत करण्यापेक्षा स्वाभिमानी जीवन जगले पाहिजे शिक्षणाचे महत्व जाणले पाहिजे या बाबासाहेबांच्या विचारानी सर्व उपस्थित भारावून गेले, तसेच पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपल्यानंतर महाड नगरपालिकेने सूरैंद्रनाथ टिपणीस येथे अध्यक्षतेखाली सार्वजनिक पाणवठ्याचा ठराव ०५/०१/१९२४ रोजी केला होता त्याची अंमलबजावणी महाडच्या चवदार तळ्याच्या संदर्भात कशी करता येईल यावर विचारविनिमय झाला.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (babasaheb ambedkar) समारोपाचा भाषण केल्यावर श्री अनंत विनायक चित्रे यानी चवदार तळ्यासंबंधी विचार बोलुन दाखविला आज ही परिषद भरली आहे ती महत्वाचे कार्य केल्या शिवाय संपू नये असे मला वाटते या महाड( Mahad Satyagraha) शहरात वंचित पीडित समाजाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे ही गैरसोय दूर व्हावी म्हणून महाड नगरपालिकेने येथील सर्व तळी सर्व जातीधर्माच्या लोकांना खुली केली असा ठराव करून बरेच दिवस झाले पण त्या तळयावर पाणी भरायचा प्रघात बहुजन समाजाकडून झाला नाही तर तो प्रघात या परिषदेने पाडून दिला तर या परिषदेने एक महत्त्वाची कामगिरी केली आहे असे म्हणता येईल तेव्हा आपण सर्वानी अध्यक्षासह महाड येथील चवदार तळ्यात प्रवेश करून पाणी घेऊ

• त्यानंतर सर्व लोक बाबासाहेबांच्या मागोमाग सभामंडपातून बाहेर पडले, त्या सर्व लोकांची मोठी मिरवणूक निघाली ही मिरवणूक महाड शहरातील सर्व पेठातून अत्यंत शांतपणे चवदार तळ्यावर गेली, चवदार तळ्यावर पोहोचल्यावर प्रथम बाबासाहेब शहाबहिरी घाटाच्या पायरी उतरून पाण्यात उतरले, खाली वाकून ओंजळ भरली व ते पाणी प्यायलै सर्व बहुजन समाजातील जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार केला त्यानंतर सर्वजण चवदार तळ्याचे पाणी प्यायले, क्रांतीच्या नव्या पर्वाला सुरवात झाली, सर्व लोकांच्या चेहऱ्यावर तेज उमटले आजवर निस्तेज असणारे चेहरे आनंदाने फुलून गेले, लोकांना नवी जाणीव होऊ लागली, शतकानुशतके जखडून गेलेल्या परंपरेच्या शृंखला तोडल्याचा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, आनंदाला उधाण आले होते, भारताच्या जीवनात अभूतपूर्व घटना घडली होती तेथे उपस्थित असलेल्या वंचित शोषित पीडित समाजाच्या नागरिकांना आपण या समाजक्रांतीचे अग्रदुत ठरू अशी पुसटशीही कल्पना नव्हती हा समाजक्रांतीचा वसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे सुरु केला आणि आयुष्यभर चालू ठेवला.

लेखक :- सचिन जनार्दन साठये

कार्यवाह समरसता साहित्य परिषद पुणे महानगर

Back to top button