Opinion

पेडोंगी…

पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका खेचराच आहे. खरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंध ही नसेलच. पण ही खेचर कोणी साधीसुधी खेचर नाही तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलं आहे. भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचर. सध्य स्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्त खेचरं काम करत आहेत.


भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्रसपाटीपासून १७,००० फुटा पर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीची रक्षा करतो. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी कोणतच वाहन आजही जाऊ शकत नाही. जिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते तिकडे दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. ह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरं. अतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचरं काम करू शकतात. अतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात ह्या पलीकडे खेचरं अतिशय प्रामाणिक असतात. त्यामुळेच आजही भारतीय सेनेचा कणा बनून भारताच्या रक्षणात आपला सहभाग देत आहेत.

‘पेडोंगी’ चं खरं सैनिकी नाव होतं Hoof Number 15328. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्क प्रणाली आणि प्रगत अशी वाहन नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होती. बॉम्ब च्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या क्रोपाला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमानइतबारे पार पाडलं.

१९७१ साल उजाडलं. भारत- पाकीस्तान युद्ध सुरु झालं. भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगी ला पाकीस्तानी सैन्यांनी पकडलं आणि आपल्या पोस्टवर तिला बंदी बनवून तिच्यावर पाकीस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण सांगते प्राण्यांना भावना नसतात? भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकीस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटर च अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटावर पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं ते ही शत्रूच्या प्रदेशात काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही. ) भारतीय हद्दीत प्रवेश करून भारतीय पोस्ट वर आपली हजेरी नोंदवली.

तिच्या प्रामाणिक आणि आपल्या देशासाठी असलेल्या प्रेमाला बघून भारताच्या त्या पोस्ट वरील बटालयीन कमांडर ने आपल्या वर असणाऱ्या ऑफिसरना पेडोंगी च्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 AT Company ASC मध्ये काम करत होती. २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती पण त्या वयात ही आपल्या पाठीवर सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होती.

ह्या युनिट चे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांना पेडोंगी च्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूत) ताईत म्हणून केली. ह्या युनिट च्या १९८९-९० च्या ग्रिटींग कार्ड वर ही पेडोंगी ला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. ह्याच युनिट सोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तर प्रदेश इकडे नंतर झाली. इथल्या खूप मोठ्या परीसरात पेडोंगी ने आपला काळ आरामात व्यतीत केला.

१९९२ ला पेडोंगी ला खास एका कार्यक्रमासाठी दिल्ली ला नेण्यात आलं. तिकडे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगी ला तिच्या पराक्रमासाठी, देश सेवेसाठी कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला तिचं नावं ‘पेडोंगी’ हे देण्यात आलं.

उत्तर सिक्कीम मध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमी च्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता पण पेडोंगी ही पहिली खेचर होती जिला हा सन्मान देण्यात आला. ह्या नंतरचा काळ पेडोंगी ने बरेली इकडेच व्यतीत केला. १९९७ ला पेडोंगी च्या सेवेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेताना जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर असं तिचं नाव सुवर्ण अक्षरांनी कायमच नोंदवलं गेलं. २५ मार्च १९९८ ला पेडोंगी ने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

असं म्हणतात की खेचाराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या आख्या आयुष्यात तो तुम्हाला रस्ता दाखवेल.

पण पेडोंगी चा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखताना संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटावर भारतीय सरहद्दीची रक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. कोणी म्हणेल की पेडोंगी ला रस्ता माहीत होता म्हणून परत आली. पण मग एकटी तीच का? तिच्यासोबत इतर पकडलेली खेचरं आली नाहीत पण ती जिवावर उदार होऊन आली.

पेडोंगी ला आज जाऊन २२ वर्षाचा कालावधी झाला पण आपलं जिवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे. तिचा भिमपराक्रम, देशभक्ती आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे. देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगी ला माझा कडक सॅल्यूट आणि तिच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार

  • विनीत वर्तक
Back to top button