News

क्षमायाचनेचा देखावा

इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिश्चन मिशनर्‍यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी फक्त कॅनडात न जाता भारतातही येऊन माफी मागावी आणि ज्यांना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही आपल्या मूळ धर्मात परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून त्यांचा प्रामाणिकपणा पाहायला मिळेल, तोंडदेखल्या माफीनाम्याने काहीही होणार नाही.
 
 ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस आपल्या पाच दिवसीय ‘प्रायश्चित्त तीर्थयात्रे’साठी कॅनडात पोहोचले आहेत. कॅनडातील निवासी शाळांतून ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लहान लहान बालकांशी केलेल्या दुर्व्यवहारासाठी पोप फ्रान्सिस मूलनिवासी समुदायाची माफी मागू शकतात, असे म्हटले जाते. याकडे मूलनिवासी समुदायाशी सामंजस्य प्रस्थापित करण्याच्या आणि तत्कालीन दुःखातूनबाहेर पडण्यासाठी मदत करण्याच्या प्रयत्नांतील कॅथलिक चर्चचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. मात्र, पोप फ्रान्सिस यांच्या केवळ माफीनाम्याने मूलनिवासी समुदायावर व मूलनिवासी समुदायातील बालकांवर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी केलेल्या अत्याचाराचे प्रकरण दाबले जाईल असे नाही. कारण, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी केलेली कुकृत्ये माफीच्याही पलीकडची आहेत, मूलनिवासी समुदायाची संस्कृती चिरडण्याची आहेत.
 

१८०० ते १९९० दरम्यान सुमारे १९० वर्षांपर्यंत ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून संपूर्ण कॅनडात कॅथलिक चर्चच्या १३९ निवासी शाळांमध्ये मूलनिवासी, मेटिस आणि इनुइट समुदायाच्या दीड लाख बालकांना भरती करण्यात आले होते. त्यामागचा उद्देश या छोट्या छोट्या बालकांच्या मना-मेंदूत कॅथलिक रिती-रिवाजाची पेरणी करण्याचा होता. हिंदूंसह जगभरातील मूलनिवासी समुदायांमध्ये लहान बालकांना देवाघरची फुले मानले जाते. कारण,त्यांचे मन अगदी निरागस असते. त्यांच्या मनात आपला-परका, आपल्या जातीचा-परक्या जातीचा, आपल्या धर्माचा-परक्या धर्माचा असा कोणताही विचार नसतो. ख्रिश्चन मिशनर्‍यांना मात्र ते मान्य नव्हते. छोटी छोटी बालके असली म्हणून काय झाले, आम्ही त्यांच्याकडे आमच्या धर्मांतराच्या उद्योगाचा कच्चा माल म्हणूनच पाहणार, या मानसिकतेने ख्रिश्चन मिशनर्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यासाठी निवासी शाळांची उभारणी केली. या लहान लहान बालकांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून शेकडो मैल लांब नेण्याचे प्रकार केले गेले.
 
 त्यांना त्यांच्या मातृभाषेतून बोलायलाही बंदी घातली गेली. छोट्या छोट्या बालकांच्या मना-मेंदूत ख्रिश्चनत्व भिनवले की, ते मोठेपणी पक्के ख्रिस्तानुयायी होतील व त्यांच्या पुढच्या पिढ्याही ख्रिश्चन म्हणूनच जन्माला येतील आणि या माध्यमातून ख्रिश्चनांची लोकसंख्याही वारेमाप वाढत राहील, जगावर ख्रिश्चन धर्माचे वर्चस्व निर्माण होईल, असे हेतू ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या या उद्योगामागे होते. त्यातूनच आपले आदेश न मानणार्‍या, ख्रिश्चनत्व न स्वीकारणार्‍या लहान लहान बालकांवर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी अमाप अत्याचार केले. त्या अत्याचारांमुळे दीड लाख बालकांपैकी सुमारे सहा हजार बालकांचा जीव गेला. त्यामुळेच आता पोप फ्रान्सिस माफी मागायला आले असले तरी शाळेतून घरी न आलेली आमची बालके नेमकी गेली कुठे, या हृदय भेदणार्‍या प्रश्नाचे उत्तरही मूलनिवासी समुदायाला पोप फ्रान्सिस यांच्याकडून हवे आहे.

पुढचा मुद्दा पोप फ्रान्सिस माफी मागण्यासाठी फक्त कॅनडातच का गेले हा आहे. कारण, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी फक्त त्याच देशात मूलनिवासी समुदायावर अत्याचार केले असे नाही. जगभरात ख्रिश्चन धर्माचा जिथे जिथे प्रसार झाला तिथे तिथे तो मूलनिवासी समुदायावर अत्याचार करण्यातूनच झाला. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील देशांमध्ये ख्रिश्चन धर्म पसरला तो तिथल्या मूलनिवासींना धर्मांतरित करण्यातूनच. इथले मूलनिवासी प्रथमपासून निसर्गपूजक, अग्निपूजक वा मूर्तिपूजक होते. पण, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी त्या सर्वांच्याच पूजापद्धतीवर हल्ला करत त्यांना ख्रिश्चन करवून घेतले. ज्यांनी ख्रिश्चन व्हायला नकार दिला, त्यांचा अतिशय क्रूरपणे छळ केला, त्यांना नरकयातना दिल्या.
 तसेच, जे ख्रिश्चन झाले त्यांच्यावरही अत्याचार केल्याची, चर्चमधल्या नन्सवर बलात्कार केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पोप फ्रान्सिस त्याचीही माफी मागतील का? सोबतच भारतातही ख्रिश्चन मिशनर्‍यांनी गोव्यात हिंदूंच्या धर्मांतरासाठी नाही नाही ते प्रकार केले. सेंट फ्रान्सिस झेवियर दि. ६ मे, १५४२ रोजी गोव्यात दाखल झाला तोच मुळी भारताच्या मातीतून मूर्तिपूजकांना उपटून टाकून ख्रिश्चन धर्माची लागवड करण्याच्या संकल्पाने. जबरदस्तीने, फसव्या धर्मांतराची, हिंदू मंदिरे आणि मूर्तींची तोडफोड करण्याची योजना त्याच्याच मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली.

इतकेच नव्हे, तर ख्रिश्चन धर्म न स्वीकारणार्‍या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली. क्रौर्याची परीसीमा गाठत फक्त हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिश्चन मिशनरी गोव्यात राबू लागले. ‘गोवा इन्क्विझिशन’ आजही त्याची साक्ष देत आहेच. पोप फ्रान्सिस कॅनडाव्यतिरिक्त अन्य देशांतील ख्रिश्चन मिशनर्‍यांनी केलेल्या अत्याचाराची आणि गोव्यातल्या इन्क्विझिशनची माफी मागतील का?
 
 आताच्या घडीला ख्रिश्चन मिशनरी हिंदू वा अन्य धर्मीयांच्या धर्मांतरासाठी निराळा मार्ग वापरताना दिसतात. आमचा येशु शक्तीशाली असून तुमचे सर्व दुःख दूर करण्याचे सामर्थ्य फक्त त्याच्याकडेच आहे, तुम्ही फक्त येशुला शरण येण्याचा अवकाश की तुमच्या सर्व यातना दूर गेल्याच म्हणून समजा, अशाप्रकारे ख्रिश्चन मिशनरी भोळ्याभाबड्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार करत आहेत.
 मुंबईसह उल्हासनगरपासून ते पूर्वोत्तरराज्ये, पंजाब, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशामध्ये ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभां’चे आयोजन केले जात आहे. त्यात येशु सर्वप्रकारचे आजार बरे करतो, कोणाची आर्थिक स्थिती दुबळी असेल, तर ती सुधारतो, घरातले संबंध ठीक नसतील, तर ते व्यवस्थित होतात आणि अशीच वेगवेगळी आमिषे दाखवली जातात. पण, मग ख्रिश्चन मिशनर्‍यांचा दावा खरा असेल, तर अजूनही ख्रिश्चनबहुल अमेरिका, युरोपादी देशांत गरिबी का आहे, तिथेही ‘कोरोना’ असो वा ‘मंकीपॉक्स’ वा अन्य कोणते आजार का उद्भवतात, पोप फ्रान्सिसदेखील व्हीलचेअरवर बसून का फिरतात, असे प्रश्न कोणी विचारत नाही. कारण, ‘चंगाई सभां’ना येणार्‍या लोकांची पुरती दिशाभूल केली जाते, त्यांना संभ्रमात पाडले जाते, लालुच दाखवली जाते.
 त्यामुळेच भारतातही ठिकठिकाणी ख्रिश्चनांची संख्या वाढत आहे. पोप फ्रान्सिस माफी मागायला आलेच, तर इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिश्चन मिशनर्‍यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी फक्त कॅनडात न जाता भारतातही येऊन माफी मागावी आणि ज्यांना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही आपल्या मूळ धर्मात परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून पोप फ्रान्सिस यांचा प्रामाणिकपणा पाहायला मिळेल, तोंडदेखल्या माफीनाम्याने काहीही होणार नाही. मग तो भारत असो वा कॅनडा.
 

Back to top button