National SecurityOpinion

खलिस्तान नावाचा कॅन्सर :-भाग ३

कोरोनारूपी व्हायरसवर यशस्वी विजय मिळवल्यानंतर आता या खलिस्तान रुपी कॅन्सरला आपल्याला धीरोदत्तपणे सामोरे जावे लागणार आहे. या ५ भागांच्या लेखमालेत आम्ही खलिस्तानच्या(khalistan) मानसिकतेचा आणि भिंद्रनवाले, अमृतपाल सिंह यांच्या इतिहासाचे पदर उलगडून सांगणार आहोत..

अफू गांजा, दहशतवाद, आर्थिक दिवाळखोरीला सरकार बळी

पंजाबमधील (punjab) सरकार आता दहशतवाद, अफू, गांजा, चरस व आर्थिक दिवाळखोरीला बळी पडताना दिसत आहे.भगवंत मान यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याच्या एका महिन्यानंतर, पटियालामध्ये खलिस्तान समर्थक कार्यकर्ते आणि हिंदू संघटना यांच्यात जोरदार संघर्ष झाला. काही दिवसांनंतर, मान यांनी सोडलेली संगरूरची संसदीय जागा शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) अध्यक्ष खलिस्तान समर्थक नेते सिमरनजीत सिंग मान यांनी जिंकली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, ‘शिवसेना हिंदुस्थान’ या पक्षाच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती.

गेल्या वर्षी दुबईहून परतलेल्या आणि आता दिवंगत अभिनेता-कार्यकर्ता दीप सिद्धू याने स्थापन केलेल्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचे प्रमुख असलेल्या अमृतपाल सिंगचा गेल्या काही महिन्यांत अचानक उदय झाला आहे. दरम्यान, सिंघू शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मोहालीमध्ये एक आंदोलन आकार घेते आहे. शिक्षा पूर्ण केलेल्या शीख अतिरेक्यांची सुटका करावी, अशी या आंदोलनाची मागणी आहे.राज्यात नियमित निघणारे खलिस्तानवादी मोर्चे आणि निदर्शने यांच्याशी हे सगळे मिळतेजुळते आहे. खलिस्तानच्या मुद्द्यावर सरकार आगीशी खेळत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या घटनांचा हवाला देतात. उदाहरणार्थ, गुरुवारी घडलेल्या अमृतपालशी संबंधित घटनेबाबत माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासह अनेकांनी आधीच इशारा दिला होता. ‘नवीन’ सरकार सत्तेवर आल्यानंतर पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक गटांच्या कारवाया वाढल्या आहेत.

गुरू ग्रंथसाहिबच्या विटंबनेनंतर काही तरुण कट्टरपंथी २०१९च्या तरणतारण बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपपत्रात, ‘एनआयए’ने म्हटले आहे की, २०१५ मध्ये घडलेल्या गुरू ग्रंथसाहिबच्या विटंबनेच्या घटनेनंतर पंजाबमधील काही शीख तरुण कट्टरपंथी झाले असावे.परिणामी, आता खलिस्तान समर्थक गटांनी विटंबनेचाच मुद्दा पुढे रेटला आहे.

पंजाब सरकारचे अमली पदार्थांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष

अमृतपाल सिंगने हाती घेतलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे, राज्यात अमली पदार्थांची अव्याहतपणे होणारी तस्करी आणि वापर, पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी आणि वापर हे वर्षानुवर्षे होत असताना आधीची सरकारे आणि आताचे सरकार त्याला आळा घालण्यात कमालीचे अपयशी ठरले आहे.अकाली नेत्यांचे अमली पदार्थांच्या माफियांशी संबंध असल्याचा आरोप, तसेच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यात विविध पक्षांच्या सरकारांना सतत आलेले अपयश यामुळे सरकार या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असा समज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचा फायदा खलिस्तान समर्थक घेऊ पाहत आहेत.
संघटित दहशतवाद की एक प्रकारची चळवळ?

खलिस्तानी समर्थक सशस्त्र कार्यकर्त्यांचा आणि पोलिसांचा सतत सुरू असलेला संघर्ष चिंताजनक आहे. अलीकडील हिंसाचाराच्या घटनांमध्ये स्थानिक गुंड आणि काही शीख लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०२२ मध्ये मोहाली येथील इंटेलिजन्स हेडक्वार्टरवर झालेल्या हल्ल्यांसाठी पोलिसांनी बहुतेक परदेशातील खलिस्तानी गटांना जबाबदार धरले आहे.पंजाबमध्ये सक्रिय असलेले खलिस्तान समर्थक गट १९८० आणि १९९०च्या दशकाप्रमाणे संघटित दहशतवाद करत नाहीत, तर ते एक प्रकारची चळवळ चालवतात. त्यामुळे सरकारला त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे कठीण होते.

सिद्धू मुसेवाला

समाजमाध्यमांचा चातुर्याने वापर करून पंजाब आणि इतरत्र आपले स्थान निर्माण केले, तर खलिस्तान समर्थक लॉबीनेही या माध्यमातूनच विशेषतः नवीन पिढीमध्ये, हिंसाचाराचे समर्थन करणार्‍या लोकप्रिय पंजाबी गायकांच्या गाण्यांमधून खलिस्तानचा मुद्दा जीवंत ठेवला आहे. जून २०२२ मध्ये, केंद्राने सिद्धू मुसेवालाच्या खलिस्तानी अतिरेक्यांचे उदात्तीकरण करणार्‍या गाण्यावर बंदी घालण्यासाठी पाऊल उचलले होते. पण, मुसेवालाची हत्या झाली आणि ते त्यानंतर ते गाणे अधिकच लोकप्रिय झाले. याशिवाय, समाजमाध्यमांमध्ये खलिस्तानचे समर्थन करणारा मजकूर मोठ्या प्रमाणावर फिरत असतो.

१९४७च्या स्वातंत्र्याने सर्वांत अधिक नुकसान झाले ते पंजाब आणि बंगालचे. त्यांची सरळ विभागणी झाली; त्यामुळे शीख हा वेगळा धर्म नाही अथवा पंजाबी ही भाषा नाही, असा प्रचार करणाऱ्या काही संस्था अथवा संघटनांमुळे शीखांमधील जहाल गटाला संधी मिळाली. मात्र, त्या वेळी हिंदू-मुस्लिम दंगलींनी इतके मोठे स्वरूप प्राप्त केले होते, की ही हिंदू आणि शीख यांचे परंपरागत ऐक्याचे संबंध पुन्हा दृढ झाले होते. पंजाबमधील शीखही दंगलींमध्ये हिंदूच्या बरोबर होते तेव्हा हिंदू शिखांमधील हा अंतर्गत प्रश्न संपला असे वाटत असताना नंतर राजकीय स्वार्थासाठी तेथील जहालमतवादी नेत्यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या मिळालेल्या गुप्त पाठिंब्यातूनच जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा उदय झाला.

त्यातूनच भारतीय सैन्याचा कणा असलेल्या शीख बांधवांनीच सैन्य दलाला आव्हान दिले आणि ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ घडले. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये हजारो शीख बळी पडले. त्यातले सर्व दहशतवादी नव्हते. त्यातूनच आपल्या धर्मस्थळावर हल्ला केल्याचा राग ठेवून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्याच शीख सहकाऱ्याकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आणि हजारो निरपराध शिखांची कत्तल झाली.

वास्तविक इंदिरा गांधी या व्यक्तिश: शीखविरोधी कधीही नव्हत्या. त्या केवळ जहालमतवादी घटकांच्या विरोधी होत्या. मात्र, ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ने जगभरातील शीखांच्या मनाला कायमस्वरूपी जखम केली. नंतर ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे सेनाप्रमुख जनरल अरुण वैद्य यांची पुण्यात १० ऑगस्ट १९८६ रोजी हत्या करण्यात आली. त्या वेळी पाकिस्तान भारताविरोधी चळवळींना सर्व प्रकारे खुलेआम मदत करत होता, तर अमेरिकेतही या क्रूर कारवायांना सहानुभूती होती. मात्र, शिखांबद्दल असलेली सर्वसामान्य भारतीयांना असलेली सहानुभूती आणि हिंदू शिखांचे असलेले पारंपरिक संबंध यामुळे पंजाब हळूहळू शांततेकडे वळला.

आज अमृतपालसिंग खूप मोठे आव्हान नसले, तरी तो तीच भाषा बोलतो आहे, जी भिंद्रनवाले बोलत होता. भिंद्रनवालेने खलिस्तानची घोषणा केली नसली, तरी अमृतपाल हा कोणी तथाकथित नेता खुलेपणाने खलिस्तान आणि हिंदूविरोधी भूमिका घेत आहे.

बहुसंख्याक आहेत या आधारावर हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडणे या देशात देशद्रोह नाही, तर शीख धर्म आणि पंजाबी भाषेच्या आधारावर खलिस्तानची मागणी करणे कसा देशद्रोह ठरतो, हा प्रश्न अमृतपाल जाहिरपणे विचारत आहे.

क्रमशः

Back to top button