Health and WellnessNews

भारताची विक्रमी कामगिरी, १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण!

मुंबई, दि. २१ ऑक्टोबर : कोरोना विरोधातील लसीकरण मोहिमेत भारताने विक्रमी कामगिरी केली आहे. भारताने आज तब्‍बल १०० कोटी डोसचा विक्रमी टप्पा पूर्ण केला आहे. कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचे अभियान भारतात सुरू करण्यात आले होते. गेल्‍या नऊ महिन्यांपासून हे अभियान अविरत सुरू असून आज १०० कोटी डोस देऊन भारताने ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे.

लसीकरणामुळे कोरोना रूग्‍णांच्या मृत्‍यूच्या प्रमाणामध्ये घट झाल्‍याचे चित्र दिसून आले. अशावेळी देशाने १०० कोटी डोसचा पल्‍ला गाठल्‍याने ही महत्वपूर्ण बाब आहे. विशेष म्हणजे ७५% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लोकसंख्येच्या ३१ टक्के लोकांनी दुसरा डोस देखील घेतला आहे. लवकरच आता १८ वर्षाखालील मुलांचेही लसीकरण सुरु होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकरत भारतातील १०० टक्के नागरिक लसवंत होतील अशी अपेक्षा केली जात आहे.

कोरोना विरोधातील १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण केल्‍याने केंद्र सरकारकडून उत्‍सवाची तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक दिवशी लाल किल्ला संकुलात आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया हे आजच्या ऐतिहासिक लसीकरणावरील गाणे प्रदर्शित करणार आहेत. देशभरात १०० स्मारके तिरंग्याने प्रकाशित करण्याची देखील योजना आहे. लाल किल्ल्यावर २२५ फूट लांब तिरंगा फडकवला जाईल. त्याचे वजन सुमारे १४०० किलो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button