Opinion

एक तरफ बंदुके दनदन, एक तरफ थी टोलियां

दिनांक १३ एप्रिल १९१९. दुपारी एक विमान अमृतसर शहरावरून चक्कर मारून गेले. पंजाबच्या बैसाखी सणाचा तो दिवस होता. खुद्द शहरातले आणि आजूबाजूच्या परिसरातले हजारो स्त्री-पुरुष अमृतसरच्या प्रख्यात सुवर्णमंदिरात येत-जात होते. तिथून जवळच असलेल्या जलियांवाला बाग (जालियानवाला बाग हा चुकीचा, इंग्रजी उच्चार ) या मैदानाकडे सरकत होते. संध्याकाळी ४.३० वा. तिथे एक सभा होणार होती.

अमृतसरच्या मिलिटरी कमांडंट कर्नल (तात्पुरता ब्रिगेडियर जनरल ) रेजिनाल्ड डायर हे वृत्त ऐकून खवळला. त्याने सकाळीच शहरात संचारबंदी जारी केली होती. बैसाखी सणाला अमृतसरला घोड्यांचा आणि गुरांचा मोठा बाजार भरायचा. दुपारी २ वाजता डायरच्या सैनिकांनी तो बाजार बंद करायला लावला . साहजिकच तिथले रिकामे लोकही जलियांवाला बागेकडे वळले. गुप्तचरांकडून डायरकडे सूचना येऊ लागल्या कि, हजारो हिंदू, मुसलमान आणि शीख लोक जलियांवाला बागेत गोळा झालेत. वातावरण तप्त होते. जमलेल्या लोकांची गर्दी नेमकी कितीशी आहे, याचा अंदाज घेण्यासाठी डायरने चक्क विमान पाठविले. ठरल्याप्रमाणे ४.३० वा. सभा सुरु झाली. संतापलेला डायर ९० सैनिकांनिशी तिथे येऊन पोचला. ५० सैनिकांकडे ‘३०३ ली-एनफील्ड रायफल्स होत्या. शिवाय त्याच्याबरोबर दोन चिलखती गाड्या होत्या नि प्रत्येकीत एकेक मशिनगन होती. जलियांवाला बाग सर्व बाजूंनी ३ ते ४ मजली इमारतींनी वेढलेली आणि मध्ये सुमारे सहा ते साडेसहा एकर मोकळं मैदान, अशा स्वरूपाची होती. सुवर्ण मंदिरापासून अगदी जवळच ही बाग आहे. डायरच्या ताफ्यातल्या चिलखती गाड्यांना जलियांवाला बागेकडे जाणाऱ्या अरुंद गल्लीतून आत शिरता येईना. म्हणून त्यांना तिथेच थांबवून नाकाबंदी करण्यात आली. स्वतः डायर आणि अमृतसर शहराचा डेप्युटी कमीशनर आयर्विंग, पन्नास बंदूकधारी सैनिकांसह बागेत शिरले. समोर १० हजार निःशस्त्र लोक शांतपणे भाषण ऐकत होते. पोलीस किंवा सैनिक यांनी जमावाला कसे हाताळावे याचे काही संकेत आहेत. प्रथम तोंडी सूचना द्यायच्या असतात. त्या न पाळल्या गेल्यास लाठीमार आणि त्याचाही उपयोग न झाल्यास गोळीबार असे टप्पे असतात. गोळ्याही जमावाच्या खालच्या बाजूला झाडायच्या असतात. म्हणजे जमाव जखमी व्हावा, त्याला जरब बसावी, पण शक्यतो माणसं मरू नयेत.

डायरने यातले काहीही न करता सरळ हुकूम दिला, ‘फायर’. युद्धात, युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुका दणादण वाजू लागल्या. समोरच्या किमान १० हजार लोकांच्या हातात मात्र कोणतेही शस्त्र नव्हतं. अखंड १० मिनिटे अविरत गोळीबार सुरु होता. काडतुसं संपली तेव्हाच गोळीबार बंद झाला.

असा हा प्रचंड पराक्रम गाजवून डायर आणि आयर्विंग आपल्या शिबंदीसह निघून गेले. नशीब एवढंच की, मशीनगन्स अरुंद रस्त्यामुळे आत नेता आल्या नाहीत. अन्यथा त्याने मुडद्यांच्या राशीच रचल्या असत्या. स्वतःला सुधारलेले, प्रागतिक, आधुनिक वगैरे म्हणवून घेणाऱ्या या इंग्रजांची मनोवृत्ती मध्ययुगीनच होती. प्रतिपक्षाला नामोहरम करायचंय ना; मग बेछूट कत्तल करा. त्याशिवाय त्यांना कळायची नाही आपली ताकद! मध्ययुगात याच मनोवृत्तीतून चंगेजखान, तैमूरलंग, नादिरशहा यांसारख्या कत्तलवानांनी शत्रूच्या मुद्यांचे मनोरे रचले नि रक्तामांसाचा चिखल केला. जालियनवाला बाग हत्याकांड प्रत्यक्ष घडवणारा रेजिनाल्ड डायर आणि त्याला अशी काहीतरी जबरदस्त कारवाई करण्याची प्रेरणा देणारा पंजाब प्रांताचा गव्हर्नर सर मायकल ओडवायर या दोघांची मनोवृत्ती तशीच होती.

अमृतसरच्या या भयंकर हत्याकांडाच्या बातम्या भारतभर पोचल्या आणि दुःख – संतापाचा एकच कहर उसळला. अमृतसरच्या सिटी सिविल सर्जन, जो स्वतःच एक इंग्रज होता, तो मृतांचा आकडा १ हजार सांगत असताना, सरकार मात्र अधिकृतपणे ३०० लोक मृत असं म्हणत होतं. स्वामी श्रध्दानंदांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात १५०० मृत असं म्हटलं होतं. वृत्तपत्रांमधून आणि सभांमधून ओडवायर, डायर आणि एकंदरीतच इंग्रज सरकारविरुद्ध प्रचंड गदारोळ झाला. ब्रिटिश संसदेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. खुद्द युद्धमंत्री बिन्स्टन चर्चिल याने भारत सरकारच्या या कृत्याची ‘सैतानी कृत्य’ या शब्दांत संभावना केली. परिणामी डायरला सैन्यातून बरखास्त करण्यात आलं आणि ओडवायरलाही इंडियन सिविल सर्विसमधून काढून मायदेशी बोलावण्यात आलं. मात्र याखेरीज आणखी कसलीही कारवाई त्या दोघांवरही करण्यात आली नाही. साहजिकच सत्तेचा माज चढलेले ते दोघेही जण, ‘आम्ही जे काही केलं ,ते ब्रिटिश साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्यच होतं, ‘ असंच म्हणत राहिले. त्यातही मायकेल ओडवायर हा जास्तच उर्मट आणि माजुर्ड होता. १३ एप्रिलच्या घटनेने देशभर प्रचंड अस्वस्थता होती. दोनच दिवसांनी म्हणजे १५ एप्रिल १९१९ रोजी पंजाब प्रांतातच दंगा सुरु झाला. गुजरानवाला या शहरात दंगा सुरु झाला. ओडवायरने सरळ रॉयल एअर फोर्सला पाचारण केले आणि सांगितले, विमानातून मशीनगन्स चालवा, तेवढ्याने भागलं नाही, तर दंगेखोरांवर बॉम्ब टाका. हवाईदलाने हुकुमाची अंमलबजावणी केली. १२ जण ठार झाले नि २७ जण जखमी झाले. हे देखील सरकारी आकडे आहेत.

परंतु रेनिनाल्ड डायर आणि मायकल ओडवायर यांचा हा माजोरीपणा आणि संताप मुळात एका भयातून निर्माण झाला होता. ते भय म्हणजे भारतात इंग्रजी राजवटीविरुद्ध १८५७ सालप्रमाणेच काहीतरी जबरदस्त क्रांती होणार आहे, अशी चाहूल त्यांना लागली होती.

१८५७ ची क्रांती दडपून टाकल्यावर इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीचं बाहुलं बाजूला करून रितसरपणे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती घेतला. एक अत्यंत बलवान आणि सूक्ष्म असं राज्ययंत्र स्थापित करून त्यांनी पुढची ४०-४५ वर्षं भारताची मनसोक्त लूट केली. पण हे सदासर्वकाळ जमेल याची त्यांना शाश्वती वाटेना. १९०५ साली व्हॉईसरॉय करझनने बंगालची फाळणी याचसाठी तर केली. पण तो उद्योग चांगलाच अंगाशी आला. आतापर्यंत असंघटित असलेला भारत उलट वेगाने संघटित होऊ लागला. इंग्रजांच्या दृष्टीने डोकेदुखी असणारे महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हे प्रांत तर भलतेच सक्रीय झाले. १९११ मध्ये इंग्रजांना झक मारत बंगालची फाळणी रद्द करावी लागली. यामुळे उत्साहीत झालेल्या क्रांतिकारकांनी १९१२ साली खुद्द व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंजवर बॉम्ब फेकला. पंजाबचे लाला हरदयाळ आणि बंगालचे रासबिहारी बसू हे युरोप – अमेरिकेतून काहीतरी जबरदस्त क्रांतियुद्ध पेटवण्याचा प्रयत्नात असल्याच्या बातम्या एकग्रजांना त्यांच्या गुप्तहेरांकडून मिळत होत्या.

तेवढ्यात म्हणजे १९१४ साली युरोपात महायुद्ध पेटलं .या युद्धात भारतीय क्रांतिकारक जर्मनी-तुर्कस्तान यांना मदतीला घेऊन अफगाणिस्तानमार्गे भारतावर लष्करी हल्ला करण्याचीही शक्यता इंग्रजांना वाटत होती. याचा बंदोबस्त करण्यासाठी १९१५ साली इंग्रजांनी ‘डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट – १९१५ ‘ नावाचा एक कायदा पारित करून घेतला. कुणाही व्यक्तीला बिना वॉरंट अटक करण्याचा आणि बिना चौकशी कितीही काळ तुरुंगात डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला मिळाला.

१९१८ साली महायुद्ध संपलं. जर्मनी-तुर्कस्तान पराभूत झाले. पण भारतीय क्रांतिकारकारकांची गुप्त ‘गदर पार्टी’ म्हणजे क्रांति पक्ष याच्या कारवाया थांबेनात.

गदर वाले भारतीय सैन्यात उठाव घडवून आणणार, अशा खबर इंग्रजाना मिळू लागल्या. याचा बंदोबस्त करण्यासाठी न्यायाधीश सर बिडने रौलेट याच्या कमिशनने ‘डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट – १९१५’ मध्ये आणखी काही कडक नियम लावले. १९१९ च्या मार्चमध्ये हा नवा रौलेट ऍक्ट लागू झाला. त्याच्या विरोधात देशभर कडक हरताळ आणि निदर्शने झाली. पंजाब प्रांतात रौलेट ऍक्टविरोधी निदर्शने करणारे काँग्रेसचे दोन मान्यवर नेते सत्यपाल आणि डॉ. किचलू यांना सरकारने पकडले आणि अज्ञानस्थळी अटकेत ठेवलं. वातावरण त्यामुळे अधिकच तापलं. येत्या बैसाखी सणाला प्रांतभर काहीतरी जबरदस्त घडणार. १८५७ सारखी क्रांतीदेखील होऊ शकते, अशा खबरा गुप्तचरांकडून मिळत गेल्यामुळे बहुदा ओडवायर आणि डायर आणखी आणखी पिसाटत गेले. इंग्रजी साम्राज्य विरुद्ध बंड करण्याची हिंमत करतात हे भारतीय? दाखवूयाच यांना इंग्रजी साम्राज्याची ताकद. म्हणजे बंड होण्याचं भय, स्वतःच्या शक्तीचा माज आणि गुलाम भारतीयांबद्दलची जन्मजात तुच्छता यातून ही कृती घडली.

  • मल्हार कृष्ण गोखले (वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.)
Back to top button