गोसंवर्धनासाठी झटणारा प्राध्यापक
![](https://vskmum.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2022/05/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87_202204091135206865_H%40%40IGHT_392_W%40%40IDTH_696-e1652440665910.jpg)
गाय वाचली, तर देश वाचेल हा विचार संघाच्या माध्यमातून गौतम कराळे यांच्या मनात रूजला होता. जाणून घेऊया वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत २०० पेक्षा अधिक गोवंश सांभाळणार्या गौतम कराळे यांच्याविषयी…
अहमदनगर शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावरील शेंडी गावामध्ये गौतम विलास कराळे यांचे बालपण गेले. गौतम यांच्या वडिलांनी एका शेतकर्याला गाय कसायाला विकताना पाहिले आणि त्यांनी ती गाय शेतकर्याकडून ५०० रुपये देऊन स्वतःच्याताब्यात घेतली. तसेच, घरीदेखील गायी असल्याने गौतम यांना प्राणीप्रेमाची आवड लागली. प्रगत विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक घनश्याम देशपांंडे यांच्या मार्गदर्शनाने गौतम यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. आठवीपासून ते संघाच्या शाखेत जाऊ लागले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गौतम यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे काम पाहून त्यांना बजरंग दलाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षा प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली. यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या अहमदनगर जिल्हा गोरक्षा प्रमुखपदाचीही जबाबदारी त्यांना मिळाली. यात त्यांच्याकडे सेंद्रिय शेती आणि गोवसंवर्धनाची जबाबदारी होती.
पदवीच्या तृतीय वर्षात शिकत असताना एकजण दुचाकीवर गायीचे वासरू घेऊन जाताना आढळल्यानंतर गौतम यांनी अधिक चौकशी केली असता ते वासरू जेवणाच्या कार्यक्रमासाठी कत्तलीसाठी नेले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ते वासरू सोडवले आणि अक्षरशः बाटलीतील दूध पाजून वाचवलेदेखील. २००४ साली गोवंश कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी गौतम यांनी कत्तलखान्यांवर धडक दिली. मात्र, त्याचवेळी ५०० कसायांचा समूह त्यांच्या अंगावर चालून आला. यावेळी केवळ स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमुळे गौतम यांचा जीव वाचला. पदव्युत्तर शिक्षण घेताना ‘गो ग्राम’ यात्रेतही त्यांनी सहभाग घेतला. २००८ साली प्रगत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले. गोवंश सोडवत असताना तो सांभाळण्यासाठी निवारा नव्हता. ही बाब लक्षात घेता आणि अपंग गायींची अवस्था पाहून व गोपालनाची आवड यामुळे गौतम यांनी २०१० साली ‘निसर्गसृष्टी गोपालन संस्थे’ची स्थापना केली. त्यावेळी संस्थेत केवळ चार गायी होत्या. शेतातील सात ते आठ गुंठे जागेत ५० बांबू आणि दहा पत्र्यांमध्ये ही गोशाळा उभी राहिली. ७०० रुपयांत सोडवलेली जानकी नावाची गाय ही संस्थेतील पहिली गाय. सध्याच्या घडीला गोशाळेत २०० हून अधिक गायी असून,यापैकी सहा गायी व दोन बैल अपंग आहेत. प्रत्येक गायीला नावदेखील दिले जाते. जेणेकरून नाव घेताच गाय जवळ येते. लोकसहभागाने संस्थेचा आवाका वाढला आणि जागा अपूरी पडू लागली. गोशाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना लोकसहभागातून त्यांनी दुसरी जागाही विकत घेतली. यामध्ये ३०० गायींच्या निवार्याची सोय होणार आहे. २०१८ साली त्यांनी बार्शी रोडवर ४८ गोवंश कसायांच्या तावडीतून सोडवले. ही आजवरची सर्वांत मोठी कामगिरी होती. गोशाळेच्या २५ किलोमीटरच्या परिसरात कुणीही गोवंश कसायांना देत नाही, हे आमच्या संस्थेचे मोठे यश असल्याचे गौतम सांगतात. “गोरक्षण करणे काहीसे सोपे आहे. मात्र, गोवसंवर्धन सर्वांत अवघड बाब आहे. भाकड जनावरांना सांभाळण्यासाठी मोठा खर्च आवश्यक असतो. चारा, वैद्यकीय खर्च मोठा असल्याने लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. गायीच्या डोळ्याला झालेला कर्करोग बरा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यात तितकेसे यश आले नाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.
इंग्रजी विषयात ‘बीएड’ उत्तीर्ण असलेले गौतम प्राध्यापकाची जबाबदारी सांभाळत गोशाळेचा भारही उत्तमरित्या सांभाळत आहेत. ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ची देखील त्यांच्या संस्थेला मान्यता आहे. अक्षय राऊत यांच्या मदतीने नुकतेच संस्थेची संकेतस्थळदेखील सुरू करण्यात आले आहे. सध्या गौतम कराळे विश्व हिंदू परिषदेचे अहमदनगर जिल्हा सहमंत्री म्हणून काम पाहत आहेत. भूमातेचे ऋण फेडले पाहिजे, याकरिता ते गोरक्षणाबरोबरच वृक्षसंवर्धनासाठीही काम करतात. मुलाचा प्रत्येक वाढदिवस ते वृक्षलागवडीने साजरा करतात. आतापर्यंत गौतम यांनी ९०० पेक्षा अधिक गोवंश कसायांच्या तावडीतून सोडवला आहे. गोपालनाचे कार्य करत असताना घनश्याम देशपांडे यांसह सध्या रामायणाचार्य संजय म. पाचपोर, विलास जाधव, गजेंद्र सोनवणे, विश्वास बेरड आणि अनेक उद्योजकांचे सहकार्य त्यांना मिळते. गोपालनाबरोबरच रक्तदान शिबिरांचे आयोजनही गौतम करतात. भविष्यात प्राण्यांची अॅम्ब्युलन्स आणि प्राण्यांचे हॉस्पिटल उभारण्याचा मानस असल्याचे गौतम सांगतात. सेंद्रिय शेतीसाठी ते विशेष आग्रही आहेत. गाय आईसमानच असते. वडिलांच्या संस्कारामुळे गोपालनाचे धडे मिळाले. गोशाळेला भेट द्यावी. संस्था लोकसहभागावरच चालते. त्यामुळे शक्य तितकी मदत करण्याचे आवाहनही गौतम करतात. गाय वाचली, तर देश वाचेल हा विचार संघाच्या माध्यमातून त्यांच्या मनात रूजला आहे. हाच विचार घेऊन सध्या गौतम प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
-पवन बोरस्ते
सौजन्य : मुंबई तरुण भारत