BusinessECONOMYOpinion

“सहारा”ने केले गुंतवणूकदारांना बे”सहारा”

”It’s fine to celebrate success, but it is more important to heed the lessons of failure.”

“सहारा ग्रुप”(sahara group ) भारतीय संघाच्या क्रिकेट जर्सीवर असलेलं सुपरिचित नाव.असं अचानक काय झालं की,”सहारा ग्रुप” च बे “सहारा” झालाय.

“सुब्रतो रॉय”, (Subroto Roy) एकेकाळी भारताच्या रियल इस्टेट, हाऊसिंग सेक्टर, आंतराष्ट्रीय गुंतवणूक,शेअर मार्केट, (Share Market) बॉलिवूड, राजकारण आणि एक्सपेन्सिव्ह लाइफस्टाइल अशा सगळ्याच क्षेत्रात आयकॉन असणाऱ्या सुब्रतो रॉयवर जेलमध्ये जाण्याची वेळ का आली?

कोणे एकेकाळी आपल्या सेकंड हॅन्ड स्कुटरवर बसून खाऊच्या पुड्या विकणारा, सर्वसामान्य परिस्थिती असणारा सुब्रतो रॉय,भारतीय अर्थव्यवस्था आणि माध्यमांमध्ये रोज चमकून दिसू लागला. एक स्कुटर, दोन खुर्च्या आणि एक टेबल यावर व्यवसाय करणारा सुब्रतो रॉय बघता बघता २ लाख कोटींचा मालक झाला होता.

दिल्लीचं राजकारण असो, किंवा राजकारण्यांशी जवळचे संबंध, बॉलिवूड मधली गुंतवणूक असो, किंवा टीम इंडियाची टायटल स्पॉन्सरशिप,अशा सगळ्याच क्षेत्रात एककलमी अंमल असणाऱ्या सुब्रतो रॉयच्या तिजोरीची आवक काही वर्षातच पन्नास पटींनी वाढत चालली होती. सर्वसामान्य परिस्थितीतून असामान्य यश कमावणाऱ्या आणि स्वतःच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचं पतन करणाऱ्या सुब्रतो रॉयल तात्पुरता दिलासा म्हणून, पॅरोल वर सोडण्यात आलेलं आहे.

भारतीय मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना आपलं टार्गेट करून,सुब्रतो रॉय याने आपल्या एका मित्राच्या साथीतून एक चिटफंड कंपनी सुरु केली. चिटफंडच्या माध्यमातून,काही ठराविक काळ,गुंतवणूकदारांना अविश्वसनीय परतावा देऊन सुब्रतो रॉयने हळू हळू गोरखपूरपासून सुरु केलेला हा व्यवसाय भारतभर वाढवला. गरीब आणि मध्यमवर्गीय संकुचित असंकुचित विचारसरणीच्या गुंतवणूकदारांना त्याने चिटफंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले आणि हळूहळू आपल्या चिटफंड व्यवसायाचं रूपांतर पॅरा बँकिंग मध्ये करण्याचा प्रयत्न सुरु केला.

मुळातच चिट फंड म्हणजे काय?

चिट म्हणजे वचनचिठ्ठी, (chit fund) असंघटित क्षेत्रातील लोक, ज्यांचा बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येतो, अशा समान उत्पन्न असलेल्या गरजू लोकांना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी या फंडाचा उपयोग होतो. भिशीच्या जवळपास जाणारा हा बचतीचा प्रकार असून त्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. काही चिट फंड कंपन्या 100 वर्षाहून जुन्या असून अजून व्यवस्थित चालू आहेत. सध्या देशभरात 10 हजाराहून अधिक चिट फंड नोंदवण्यात आले असून पश्चिम बंगाल मधील शारदा चिट फंड मधील गैरव्यवहार उघडकीस आल्याने हे फंड या ‘फसव्या योजना’ (Ponzi Scheme) म्हणून अधिक चर्चेत आहेत.

चिट फंड कंपनी लोकांच्या बचतीच्या माध्यमातून जमा झालेली मोठी रक्कम भांडवल रूपाने उपलब्ध करून देते. त्यावर अप्रत्यक्षपणे व्याजाची आकारणी करीत असते.चिट फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीस चिट फंड कंपनी म्हटले जाते. विविध प्रकारच्या गटांसाठी मर्यादित कालावधी असलेल्या विविध योजना त्यांच्याकडून सातत्याने आणल्या जातात. यात भाग घेणारे सर्वजण हे त्या कंपनीच्या योजनेचे सभासद असतात. यातील प्रत्येक योजना या चिट फंड कायद्याखाली नोंदवून मंजूर करून घ्याव्या लागतात. या कंपन्या आपले संभाव्य ग्राहक शोधतात, त्यांच्याकडून योजनेची वर्गणी गोळा करतात. फंड वितरित करून त्याच्या हिशोबाच्या नोंदी ठेवतात. प्रत्येक योजनेमागे काही रक्कम योजना चालन फी म्हणून वसूल करतात. अशी योजना आणण्यापूर्वी ही कंपनी जाहिरात करून गरजू सभासद एकत्रित करून त्यांचा एक गट तयार करते. सभासदांच्या संख्येएवढे महिने हा योजना कालावधी असून या कालावधीसाठी दरमाह ठराविक रक्कम गोळा केली जाते.

थोडक्यात काय गरजुंना मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून जमा केलेला फंड..

देशभर जाहिरातीच्या माध्यमातून १९८० च्या दशकात भारतीय बँकिंग पेक्षा जास्त परतावा मिळेल आणि, आयुष्यात येणारा वाईट काळ असो, मुलीचं लग्न असो, मुलांचं शिक्षण असो, जोडधंदा असो, परदेशी शिक्षण असो, किंवा हॉस्पिटलचा खर्च असो, अशा प्रत्येकच मध्यमवर्गीय विचारसरणीतून येणाऱ्या विचारांवर “स्कीम” देत देत सुब्रतो रॉयच्या चिटफंड आणि सहारा समूहाला लाखो लोक जोडले गेले.

याच गुंतवणुकीच्या जोरावर बिस्कीट आणि मुरमुऱ्याच्या पुड्या विकणारा सुब्रतो रॉय अचानक भारतीय माध्यमात नवा बिजनेस टायकून म्हणून मिरवू लागला.

१९८० मध्ये त्याच्या चिटफंड आणि पॅरा बँकिंग वरती सरकारने रोख लावताच, काही काळातच त्याने आपला मोर्चा हौसिंग सेक्टर कडे वळवला. प्रचंड नफ्यात असणाऱ्या सुब्रतो रॉयने नंतर सहारा रिअल इस्टेट, वित्त, पायाभूत सुविधा, मीडिया, मनोरंजन, आरोग्य सेवा, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, रिटेल, माहिती तंत्रज्ञान आणि विमानसेवा या सगळ्याच अग्रगण्य व्यवसायात आपला जम बसवण्याची सुरुवात केली. तब्बल ११ वर्षे “सहारा” भारतीय क्रिकेटचा मुख्य स्पॉन्सर म्हणून जगभर मिरवत होता. जसा जसा व्यवसाय वाढत होता तास तास सुब्रतो रॉयच्या संपत्तीचा आलेख वाढतच चालला होता.

जगप्रसिद्ध टाइम्स मासिकाने तर, भारतामध्ये ,भारतीय रेल्वेनंतर नौकरी देणारी सर्वात मोठी संस्था म्हणून “सहारा”समूहाचा गौरव केला होता. लक्झरी लाईफ, न्यूयॉर्क मध्ये ४४०० कोटींची आलिशान हॉटेल्स, १७० एकर मध्ये गौतमीनगर मध्ये वसवलेली मेगासिटी,मुंबई जवळची अँबी व्हॅली, मुलांच्या लग्नात ५०० कोटींहून अधिक रुपयांची उधळण आणि आजही देशाच्या विविध भागात १७६४ एकरहून अधिक जमीन असणाऱ्या सुब्रतो रॉय याला २००९ साली SEBI ने DRHP (Draft Red Herring Prospectus) म्हणजेच कंपनीचा संपूर्ण रिझ्युम मागितला कारण सहाराने कंपनीने IPO आणण्याची योजना आखली होती. या मागणीनंतरच खऱ्या अर्थाने ११ लाखांहून जास्त नौकरदार असणाऱ्या “सहारा” कंपनीच्या पतनाची सुरुवात झाली.

SEBI VS SUBRATO ROY:-

सन २००९ मध्ये, सहाराने SEBI ला त्यांच्या सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन कंपन्यांचा IPO आणण्याचा प्रस्ताव दिला होता. सेबीला सहाराच्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली. सहारावर गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्या दोन्ही कंपन्यांच्यातीन कोटी गुंतवणूकदारांकडून २४,००० कोटी रुपये गोळा करून हा पैसा गैरमार्गाने स्टॉक एक्स्चेंज मध्ये वळवण्याचा ठपका ठेवत सेबी ने या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध नाहीत असा दावा करत,निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाराला १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

सेबीने गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांची मागणी केल्यानंतर सहारा ची तब्बल १२७ मोठे ट्रक्स भरून कागदपत्रे मागविण्यात आली होती. ज्यामुळे सेबीच्या बाहेरील बाजूस मोठा ट्राफिक जॅम झाला होता.

कालांतराने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. जिथे सुब्रत रॉय यांच्या वतीने प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी बाजू पहिली आणि सुब्रत रॉय यांना वाचवण्याचा त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.गुंतवणूकदारांशी फसवणूक आणि इतर गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आणि सुब्रतो रॉय याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

१५% व्याजासह सहाराच्या गुंतवणूकदारांना २४०० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते.या निकालाची अंमलबजावणी झाली नाही म्हणून २०१४ फेब्रुवारीला सुब्रतो रॉय याला पुन्हा एकदा अटक झाली.दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सुब्रतो रॉय पॅरोलवर बाहेर आला आहे मात्र गुंतवणूकदारांच्या हिस्स्याचे पैसे,सेबीनेच लाटल्याचा आरोप सुब्रतो रॉय याने करून या सगळ्या प्रकरणाला नवा ट्विस्ट दिला आहे.

सहारा मध्ये गुंतवणुकीत नाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारावर मात्र कर्जाची टांगती तलवार सेबी आणि सुब्रतो रॉयच्या वादात लटकत राहील याबाबत शंका नाही.

“If you can’t fly then run, if you can’t run then walk, if you can’t walk then crawl, but whatever you do you have to keep moving forward.”

-Martin Luther King, Jr.

https://www.business-standard.com/article/markets/sebi-issues-notice-to-attach-bank-accounts-of-subrata-roy-sahara-122122600759_1.html

https://satnanews.net/national-news/subrata-roy-why-is-sahara-unable-to-return-peoples-money-where-is-the-screw-stuck/

Back to top button