News

स्वातंत्र्य चळवळ म्हणजे भारताचे ‘स्व’ त्व जागृत करणारी चळवळ– सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

धारवाड़ दि. ३० ऑक्टोबर : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत एकत्रितरित्या काम करतील, तसेच विविध उपक्रमांचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अनाम क्रांतिकारकांचे जीवन समाजासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धारवाड येथे रा.स्व. संघाच्या आयोजित अ.भा.कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या समारोप आज झाला. त्यानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल समाज अनभिज्ञ आहे. अशा क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजित करणे, तामिळनाडूतील वेलू नाचियार, कर्नाटकातील अबक्का, राणी गांदीलु बद्दल माहिती नाही, त्यांचे जीवन समाजासमोर आणणे. असे काही उपक्रम अमृत महोत्सवानिमित्त होणार आहेत. असे सांगून ते म्हणाले की,भारतातील स्वातंत्र्य चळवळ जगात वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. स्वातंत्र्य आंदोलन सर्वाधिक काळ चालले. स्वातंत्र्य आंदोलनात देशाची एकात्मता ठळकपणे दिसून आली. ही स्वातंत्र्य चळवळ केवळ इंग्रजांविरोधात नव्हती, तर ती भारताचे ‘स्व’ जागृत करणारी चळवळ होती. याकरिता यामध्ये स्वदेशी, स्व-भाषा, स्व-संस्कृतीचा समावेश झाला. त्यामुळे भारताच्या स्व चा अर्थ इंग्रजांना येथून केवळ हाकलणे, एवढेच नव्हते. तर भारताचा आत्मा जागृत करण्याचे होते, याकरिता स्वामी विवेकानंदांसहित अनेक महान पुरुषांनी मोलाची कामगिरी बजावली. याचबरोबर याप्रसंगी सध्याच्या पिढीने भारताला प्रत्येक क्षेत्रात जगात उत्कृष्ट बनविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा मनाशी संकल्प करायला हवा.

सरकार्यवाह पुढे म्हणाले की, शीख पंथाचे नववे गुरु तेगबहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशवर्षाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या सहयोगाने कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरु तेगबहादूर यांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणाकरिता बलिदान दिले होते. त्यांच्या स्मृती आणि प्रेरणा सध्याच्या पिढीला माहिती व्हायला हवी.

ते म्हणाले की, कार्यकारी मंडळाच्या वर्षभरात दोन वेळा बैठका होतात, एक प्रतिनिधी सभेपूर्वी होते तर दुसरी दिवाळी आणि दसऱ्याच्या दरम्यान होते. आता होणारी बैठक ही तीन दिवसीय बैठक असते. कोरोनामुळे मागच्या वर्षी बैठक होऊ शकली नाही. कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी लाखोंच्या संख्येने सेवाकार्य केले. कोरोनामुळे संघकार्याच्या विस्तारात देखील अडथळा आला, शाखा व्यवस्थित लागू शकल्या नाहीत, देशभरातील प्रवासातही अनेक अडचणी आल्या. शाखेच्या रुपात प्रत्यक्ष कार्य प्रभावित झाले, मात्र सेवेच्या रुपात व्यापक कार्य झाले. नित्य शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांसोबतच केवळ कार्यक्रमांत येणाऱ्या स्वयंसेवकांनीदेखील अत्याधिक सक्रियतेने कार्य केले.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर येणाऱ्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता त्याच्याशी सामना करण्याच्या तयारीच्या दृष्टीने प्रत्येक राज्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जर तिसऱ्या लाटेची परिस्थिती ओढावलीच तर समाजाच्या सहयोगाने त्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहोत. परमेश्वराकडे प्रार्थना आहे की, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, पण तिसरी लाट आलीच तर परिस्थितीशी सामना करण्यास आपण सज्ज आहोत.

३४ हजार ठिकाणी दैनिक शाखा, साप्ताहिक मिलन १२ हजार ७८० ठिकाणांवर, मासिक मंडली ७ हजार ९०० ठिकाणी, एकुणच ५५ हजार ठिकाणी संघाचे प्रत्यक्ष कार्य आहे. सध्या देशभरात ५४ हजार ३८२ दैनिक शाखा लागत आहेत.

वर्ष २०२५ मध्ये रा.स्व. संघ स्थापनेस १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक तीन वर्षात संघटन विस्ताराची योजना बनवित आहोत. या दृष्टीने आम्ही विचार केला आहे की, मंडल स्तरावर आपले काम व्हायला हवे. आता देशात ६ हजार ४८३ भागापैकी ५ हजार ६८३ भागामध्ये संघ कार्य आहे. ३२ हजार ६८७ मंडलांमध्ये काम आहे, ९१० जिल्ह्यांपैकी ९०० जिल्ह्यांत काम आहे, ५६० जिल्ह्यांत जिल्हा केंद्रावर ५ शाखा, ८४ जिल्ह्यांत सर्व मंडलांमध्ये शाखा आहेत. आम्ही विचार केला आहे, की आगामी तीन वर्षांत संघ कार्य (वर्ष २०२४) सर्व मंडलांपर्यंत पोहोचायला हवे. पूर्णवेळ कार्यकर्त्यांबाबतीतही योजना तयार करण्यात आली. २०२२ ते २०२५ पर्यंत कमीत कमी दोन वर्ष वेळ देणारे कार्यकर्ते तयार करणार आहोत, याची संख्या मार्च महिन्यात येईल. कोरोनामुळे दैनंदिन शाखा घेण्यात अडचणी येत होत्या तरीही संपर्काच्या आधारावर देशात १ लाख ५ हजार ९३८ ठिकाणी गुरुपूजनाचा कार्यक्रम करणे शक्य झाले.

मा. दत्तात्रेय होसबाळे म्हणाले पुढे म्हणाले की, कोरोनामुळे शिक्षण आणि रोजगारावर दुष्परिणाम झाला. लोकांच्या स्वावलंबनाकरिता स्वयंसेवकांनी कार्यप्रारंभ केले आहे. कौशल्य प्रशिक्षण, स्थानिक नागरिकांद्वारे उत्पादित वस्तूंचे मार्केटिंग, बँक कर्ज उपलब्ध करणे आदी रोजगार निर्मितीच्या कार्यात स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत. आगामी काळात यावर विशेष लक्ष देऊन प्रयत्न करणार आहोत.

लोकसंख्या धोरणाबद्दल प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, की प्रत्येक देशात लोकसंख्या धोरण निश्चित व्हायला हवे आणि ते समाजातील सर्व वर्गांना सामाईक पद्धतीने लागू व्हायला हवे. नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता लक्षात घेऊन लोकसंख्या विषयक धोरण तयार करायला हवे. सरसंघचालक डॉ, मोहन भागवत यांनी संघाद्वारे पूर्वी संमत झालेल्या प्रस्तावाविषयी आधारावरच पुन्हा स्मरण केले आहे.

पर्यावरण संरक्षण हे प्रत्येक दिवसाचे कार्य आहे, केवळ दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणून समस्येवर तोडगा निघू शकेल का, यामुळे समस्येचे निराकरण होऊ शकणार नाही. जगातील अनेक देशांत फटाक्यांचा वापर केला जातो. यामुळे, कोणत्या प्रकारच्या फटाक्यांवर बंदी आणायला हवी, हे पाहायला हवे. समग्रतेने विषय पाहायला हवा, यावर लगेचच निर्णय होऊ शकत नाही. समग्रतेने आणि वेळोवेळी यावर चर्चा व्हायला हवी. यामुळे मिळणाऱ्या रोजगाराविषयीही विचार करायला हवा.

कोणत्याही प्रकारे संख्या वाढविणे, फसवणुकीतून, प्रलोभनातून मतांतरण करणे योग्य नाही. हे स्वीकारार्ह नाही. अँटी कनव्हर्जन बिलाचा विरोध का होत आहे. हे सगळ्यांसमोर आहे. हिमाचलात काँग्रेस सरकारने अँटी कनव्हर्जन बिल संमत केले, अरुणाचलात काँग्रेस सरकारने अनुभवाच्या आधारावर कायदा संमत केला. याकरिता मतांतरण थांबविले पाहिजे, आणि ज्या लोकांनी मतांतरण केले आहे त्यांनी घोषणा करायला हवी, ते दोन्ही बाजूने लाभ घेऊ शकत नाहीत. सरकार्यवाह म्हणाले, जर मतांतरण थांबविण्यासाठी कायदा झाला तर आम्ही त्याचे स्वागत करु.

प्रमुख मुद्दे

अमृत महोत्सवात अनाम क्रांतिकारकांचे जीवन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न
देशभरात ५५ हजार ठिकाणी संघाचे प्रत्यक्ष कार्य, ५४ हजार ३८२ दैनिक शाखा
पुढील तीन वर्षांत मंडलस्तरावर संघकार्य पोहोचविण्याचे उद्दिष्ट

Back to top button